तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहून भाजपच्या मदतीने राजकीय दिशा ठरवणार -माजी आमदार जयवंतराव जगताप…
करमाळा, प्रतिनिधी -करमाळा तालुक्यातील अनेक विविध विकासकामे प्रलंबित असून विशेषतः कुकडीचा प्रश्न मार्गी लावणे, वीज वितरण कंपनीतील प्रश्न सोडवणे, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळवणे यांसह तालुक्यातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी कार्यरत असून
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकीय निर्णय घेत राहू, असे प्रतिपादन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी माजी आमदार जगताप यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, संचालक बबनराव मेहर, सोसायटी सचिव अमृत कटारिया, मार्केट कमिटीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर, युवा नेते रवींद्र उकिरडे, डॉ. बारकुंड, दिगंबर रासकर, खडकीचे प्रगतशील शेतकरी आबा नलवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.आ. जगताप म्हणाले की, मी राजकारणात कधीच कोणाचा द्वेष केला नाही,
विरोधक असला तरी त्याचे काम करण्याचे प्रयत्न केले. माझ्या राजकीय कारकीर्दीत कधी जातीवादाला थारा दिला नाही. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत. स्वार्थाच्या राजकारणासाठी सहकारी संस्थांचा बळी देणे, हे तालुक्याला परवडणारे नाही. ज्या ज्या वेळेस जगताप गटाच्या हातात सत्ता आली त्या त्यावेळेस आम्ही प्रामाणिकपणेच काम केले. जगताप गटावर करमाळा तालुक्यातील जनतेचा विश्वास असून त्या विश्वासाला पात्र राहूनच काम करीत आहे. ‘भगवान के घर देर है, अंधेर नही है’ या म्हणीप्रमाणे यापुढील काळात सुद्धा जगताप गटाचे राजकीय भवितव्य उज्वल असणार आहे, याचा मला आत्मविश्वास असल्याचा दावा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केला.