शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती व शेतीमध्ये जलतारा प्रकल्प करणे काळाची गरज -पोलिस निरीक्षक रणजीत माने…


विकसित गाव अभियानांतर्गत तुळजापूरच्या एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांचा सरपडोह गावभेट दौरा

करमाळा, प्रतिनिधी – शेतीसाठी पाण्याची कमतरता लक्षात घेऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी शेतीमध्ये जलतारा प्रकल्प तयार करण्याचे आवाहन करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या विकसित गाव अभियानांतर्गत तालुक्यातील सरपडोह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रकल्पांतर्गत तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या महाविद्यालयातील एम. एस. डब्ल्यू. विद्यार्थ्यांनी सरपडोह येथे गाव भेट अभ्यास दौरा केला. यानिमित्ताने पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी सरपडोह येथे भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये पावसाचे पाणी थांबवण्यासाठी जलतारा प्रकल्प करावेत. त्यामुळे गावाची भूजल पातळी वाढेल असे पोलीस निरीक्षक माने यांनी यावेळी सांगितले. यासोबतच मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्व विशद करत सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचे सुपीकता टिकून राहते, जैवविविधता वाढते, शेती करण्याचा खर्च कमी होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. उपसरपंच नाथराव रंदवे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे (+२ स्तर) सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांच्यासह एम. एस. डब्ल्यू.च्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सरपंच पांडुरंग वाळके, अरुण चौगुले, पोलीस पाटील संघटनेचे संदीप पाटील, पोलीस पाटील अंकुश खरात, सोसायटी चेअरमन लक्ष्मण खराडे, ग्रामपंचायत सदस्य बाळू गवारे, दत्ता मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ भिताडे, मनोहर रंदवे, अजय घोगरे, अनिल आरणे, रोहित बोंद्रे, नागनाथ काळे, कालिदास काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page