दहिगाव योजनेचे पाईप दुसऱ्यांदा जाळले; मोकाट आरोपी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक…
आरोप करणारांनी पुरावे देण्याचे आमदार नारायण पाटील यांचे आवाहन…
करमाळा, प्रतिनिधी – दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या नलिका वितरण प्रणालीचे काम गेल्या ४ महिन्यांपासून बंद असून या कामासाठी वापरण्यात येणारे पाईप दोन वेळा जाळून जवळपास २८ लाखांचे नुकसान झाले आहे. पोलीसांत तक्रार करूनही हे कृत्य करणारे आरोपी मोकाट असल्याने प्रशासनाच्या या कुचकामी धोरणा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून येत्या १६ मे रोजी अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर बोलताना अवताडे यांनी सांगितले आहे की, गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून करमाळा तालुक्याचा बिहार बनू पाहत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील २४ गावांची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या ४ महिन्यापासून बंद पाडले गेले आहे. हे कमी म्हणून की काय, उजवी लघु वितरीका क्र. ६ वरील बंदनलिका वितरण प्रणालीसाठी आणलेले २८ लाखांचे पाईप आतापर्यंत जाळण्यात आले आहेत. यासंबंधी करमाळा पोलीस स्टेशनला २ वेळेस एफ आय आर ही दाखल केलेला आहे. परंतु अद्यापही आरोपी मोकाटच आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ हे गोकुळ दूध संघाच्या सौर प्लांटच्या उद्घाटनासाठी करमाळ्यात आले होते. त्यावेळेस त्यांनी करमाळ्याचा बीड होऊन देऊ नका, असे सूचक विधान केले होते. गोकुळच्या सौर प्लांटच्या कामातही अनेक अडथळे आणले गेल्यामुळे उद्विग्न झालेल्या मंत्री महोदयांनी आमदार नारायण पाटील यांना उद्देशून तो इशारा दिल्याचे बोलले जात आहे. याउपरही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये काहीही बदल झालेला नाही. यापूर्वी दहिगाव योजनेचे १४ फेब्रुवारी रोजी १५ लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आले होते. गुरुवारी (८ मे) रोजी परत १३ लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आलेले आहेत. त्यामुळे १६ मे रोजी अर्जुन नगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती अवताडे यांनी दिली आहे.
याबाबतच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, करमाळा तहसीलदार, करमाळा पोलीस स्टेशन यांना दिल्या गेल्या आहेत.
लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने करमाळ्याचा बिहार बनवण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू आहे, परंतु तो आम्ही हाणून पाडणार असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर हा प्रकार घातलेला असून करमाळ्याचा बिहार होऊन देणार नाही.
-भरत अवताडे,
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
बंद नलिकेमुळे पाणी पाझणार नाही म्हणून लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा बंदनलिका वितरण प्रणालीला विरोध आहे. परंतु गेल्या पंचवार्षिक मध्ये विरोधकांनी हे काम घेतले असल्याने त्या कामाच्या पूर्ततेसाठी खोटे आळ घेतले जात आहेत. सदर योजनेचे पाईप आमच्या कार्यकर्त्यांनी जाळण्याचे पुरावे आरोप करणारांनी द्यावेत, दोषींना आम्ही शासन करू.
-नारायण पाटील, आमदार करमाळा.
दोन वेळेस काम बंद पाडले, दोन वेळेस पाईप जाळले हे आता खूप झाले. आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दहिगाव योजनेमुळे क्रांतिकारक बदल होऊ लागलेला असताना विध्वंस प्रवृत्तीची मंडळी सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने हे विघातक कृत्य करत असून त्याचा आम्ही जाहीर निषेध म्हणून व दहिगाव योजनेचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी रास्ता रोको करत आहोत.
-आशिष गायकवाड
माजी सरपंच, देवळाली.
.
.