पर्यावरणाच्या हानीबद्दल ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेडच्या युनिट क्र. ३ ला दंड; बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश…
साखर कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाबद्दल प्रथमच मोठा निर्णय
करमाळा, प्रतिनिधी – कारखान्यामधून होणाऱ्या जल व हवा प्रदूषणाबाबत मोठ्या दंडासह बाधित शेतकऱ्यांनाही लाखोंची भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेडच्या नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील शिवणी (जामगा) येथील युनिट क्र. ३ या कारखान्याच्या परिसरातील २४ बाधित शेतकऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठात अर्ज दाखल केला होता.
मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल बोमनाळे व इतर २३ शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जात सदर कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती पत्रातील अटींची पूर्तता न केल्याचे सांगितले होते. अपुरी प्रदूषण नियंत्रण सयंत्रणा बसविल्यामुळे व ती व्यवस्थित न चालवल्यामुळे या २४ अर्जदारांच्या शेतजमिनीचे, पर्यावरणाचे आणि पिकांचे न भरून येणारे नुकसान झाल्याचे या अर्जात नमूद करण्यात आले होते. पर्यावरणाची हानी झाल्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने या कारखान्याकडून योग्य ती नुकसान भरपाई भरुन घेण्यासाठी खंडपीठात शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये हा अर्ज दाखल केला होता. त्यावर दि.३०/०४/२५ रोजी हा निर्णय देण्यात आला आहे.
यासोबतच झालेल्या वैयक्तिक नुकसानीची भरपाई मिळवण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त वरिष्ठ विधी अधिकारी ॲड. दत्तात्रय देवळे (करमाळा) यांचे मार्फत या २४ शेतकऱ्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केलेला होता. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त समिती नेमली होती. या समितीने कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी करून, प्रत्यक्ष नमुने गोळा करून आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांवरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या सूत्राप्रमाणे पर्यावरणाच्या झालेल्या नुकसान भरपाई पोटी ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेडच्या युनिट क्र. ३ ला रु.१,१३,४०,०००/- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे २ महिन्याच्या आत भरण्याबाबत आणि उपाय योजना करण्याकरिता ६ महिन्याच्या आत खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेडच्या युनिट क्र. ३ यांनी बाधित २४ शेतकरी व त्यांच्या कुटुंबाचे इतर ७ सभासद यांच्या पिकांच्या झालेल्या वैयक्तिक नुकसानीसाठी रु.५४,४३,९५५/- नुकसान भरपाईची जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे भरून जिल्हाधिकारी यांनी ही रक्कम संबंधित ३१ शेतकऱ्यांमध्ये वाटण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणामध्ये कारखान्यातर्फे ॲड. अभिषेक चिटणीस, म.प्र.नि. मंडळातर्फे ॲड. विलास जाधव आणि पर्यावरण विभागामार्फत ॲड. अनिरुध्द कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
.
.