रावगावच्या विशेष ग्रामसभेत रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी मतदानावर बहिष्काराचा ठराव; जलजीवन योजनेच्या निकृष्ट कामावरही बहिष्कार…
करमाळा, विशाल परदेशी – रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी लाभक्षेत्रातील गावांत आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे ठराव घेण्याचा झंझावात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. २३ रोजी सकाळी रावगावच्या हनुमान मंदिर सभामंडपात झालेल्या विशेष ग्रामसभेत रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या मागणीसाठी मतदानावर बहीष्काराचा ठराव घेण्यात आला. रिटेवाडी प्रश्नासोबतच जलजीवन योजनेच्या निकृष्ट कामावरही ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे.
या ग्रामसभेत अंजनडोहचे माजी सरपंच शहाजी माने आणि पोथरे गावचे सरपंच अंकुश शिंदे यांनी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पाणी फाऊंडेशनचे प्रतिक गुरव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना तालुक्यातील कुंभारगाव येथील गटशेतीचे उदाहरण देऊन गट शेती कशी उपयुक्त आहे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी गावातील जलजीवन मिशन योजनेचे झालेले काम निकृष्ट असल्याने तसेच ठेकेदाराने विनाकारण काम बंद ठेवले असून होत असलेले काम व्यवस्थित होत नसल्याने सांगत या कामावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या ग्रामसभेला रावगावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले तर आभार उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांनी मानले.