सूरसुधा संगीत महोत्सवातील शास्त्रीय नृत्याने रसिक मंत्रमुग्ध; विविध पुरस्कारांचे वितरण…
पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान…
करमाळा, प्रतिनिधी – सूरताल संगीत विद्यालयाच्या वतीने शनिवारी घेण्यात आलेला सूरसुधा संगीत महोत्सव विविध गीतांच्या आणि बहारदार शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने संपन्न झाला. यासोबतच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिवाय या कार्यक्रमा दरम्यान पत्रकार दिनानिमित्त शहर व तालुक्यातील पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक दत्तात्रय देवळे, ॲड. डॉ. बाबुराव हिरडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कोलकत्ता, गुवाहाटी, मध्यप्रदेश, तेलंगना, आसाम, मुंबई येथील कलाकारांनी कथक, सत्रीय, भरतनाट्यम, कुचीपुडी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली.
यानंतर सूरताल संगीत विद्यालय आणि यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. कविता कांबळे यांना संगीत रसिक तर करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांना बा. सं. नरारे महाराज जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. कलाकारांतून सरबानी सेन (कोलकता) व चित्रलेखा गोगोई (गुवाहाटी), डॉ. विधी नागर (इंदोर) व डॉ. मयुरा आनंद खटावकर यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, स्नेहा रामचंद्र (हैदराबाद) व अर्पिता व्यंकटेश (कोलकता) यांना नृत्य शिरोमणी अवार्ड, काकली हजारिका (गुवाहाटी) व वनिता भांजा, (भूबनेश्वर) यांना नृत्य सम्राज्ञी अवार्ड तर दीपिका बोरो (गुवाहाटी) यांना करमाळा नृत्य कला अवार्ड देऊन गौरविण्यात आले. यावेळी यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना सुर सुधा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रा. मिलींद फंड, संतोष पोतदार, लक्ष्मण लष्कर, दिगंबर पवार, डॉ. महेश वीर, महादेव फंड, सुहास कांबळे, सारंग ढवळे, अशोक बरडे, गणेश आरडे, किरण नरारे, किशोरकुमार नरारे, शंभू आलापुरे, निलेश कुलकर्णी, निशांत खारगे, रोहीत ढवळे, बाळासाहेब महाराज आदी मान्यवर व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. संतोष पोतदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. राग भैरवी गाऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.